सातारा जिल्हा मराठा साम्राज्याची राजधानी होती. त्याचा विस्तार सुमारे १४लक्ष कि .मी. इतका होता. या भूमीला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील अनेक वीर योध्दे, राजे, संत आणि थोर व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे. इ.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार, सातारा जिल्ह्यातील सर्वांत जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी करहाटक) प्रसिद्ध होते व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला, त्या वाई तालुक्याला 'विराटनगरी' म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकांपर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) 'सातवाहनांचे' राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे 'चालुक्य', 'राष्ट्रकुट', 'शिलाहार', 'देवगिरीचे यादव', 'बहामनी' व आदिलशाह,(मुस्लिम राज्यकर्ते ), शिवाजी महाराज (मराठी राज्यकर्ते ), शाहू महाराज, आणि 'शाहू -२ प्रतापसिंह' यांनी राज्य केले.
शहाजीराजांचा मुलगा व मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली सत्ता उत्तर पुण्याच्या डोंगराळ भागांत पुणे आणि सुपा येथे स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी तिथे त्यांचे वडील शहाजीराजे यांची सुभेदारी होती. शिवाजी महाराजांच्या सत्तेच्या काळातील सर्वांत मोठया घडामोडी या पुणे आणि सातारा या परिक्षेत्रातच विशेष करुन सहयाद्रींच्या पर्वतरांगांभोवतीच घडल्या. जिल्ह्याचा पश्चिमेकडील भूभाग पुर्णतः घनदाट जंगले, उंच टेकड्यांनी व्यापलेला असल्याकारणाने शिवाजी महाराजांनी तिथे सुमारे २५ किल्ले स्थापन केले. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर आदिलशाह व मुघलांशी लढा दिला. शिवाजी महाराज यांच्या या वाढत्या पराक्रमामुळे आदिलशाहने विजापूरचा महाकाय सरदार अफझलखानास धाडले. त्यावेळी त्याच्याबरोबर अफाट सैन्य होते. तो लोकांना छळत व पंढरपूर व तुळजापुरातील मंदिरांची नासधूस करीत आला. त्याचा ऐतिहासिक पराभव व शेवट उंच विशाल आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या प्रतापगडावर (पूर्वी भोरप्याचा डोंगर) झाला. सन १६६३ मध्ये शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा असे दोन किल्ले मिळवले. कालांतराने परळीच्या किल्ल्याचे नामकरण सज्ज्नगड असे झाले. सातारा शहरापासून १२ किमी अंतरावर सज्ज्नगड हा किल्ला आहे. सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य होते. सातारा शहर हे अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने अजिंक्यतारा हा किल्ला मिळवला.कालांतराने परशुराम प्रतिनिधी यांनी सन १७०६ मध्ये तो पुन्हा मिळवला. सन १७०८ मध्ये शाहू महाराजांनी या किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवला.
सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला सातारा जिल्हा एक सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला परिसर आहे. १६ व्या शतकात स्थापित झालेल्या या शहराने मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून छत्रपतींच्या कालखंडात महत्त्वाची भूमिका बजावली. सातारा नाव हे “सात ताऱ्यां” पासून घेतले आहे, जे शहराच्या भोवती असलेल्या सात डोंगरांचे महत्व सांगते. या जिल्ह्याला “सैनिकांचे शहर” अशी उपाधी मिळालेली आहे, जे त्याच्या मजबूत लष्करी पार्श्वभूमीला सन्मान देतात.
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमाजवळ स्थित सातारा आहे, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलते. सातारा जिल्हा आपल्या स्ट्रॉबेरी उत्पादनासाठीदेखील प्रसिद्ध आहे, विशेषतः महाबळेश्वर, वाई, आणि पाचगणी हे भाग भारतातील सुमारे ८०% स्ट्रॉबेरी उत्पादन करतात. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला तर भौगोलिक दखल (जीआय) उपाधी देखील प्राप्त आहे.
जिल्ह्यात अनेक आकर्षक रमणीय भूप्रदेश आहेत, ज्यामध्ये जागतिक वारसास्थळ कास पठार, जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर, वजराई आणि ठोसेघर धबधबे, सज्जनगड, अजिंक्यतारा किल्ला, वासोटा किल्ला, प्रतापगड किल्ला आणि चाळकेवाडी पवनचक्की पठार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. येथे भेट देण्यासाठी सर्वांत सुंदर काळ पावसाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) असतो, जेव्हा संपूर्ण भाग अत्यंत सुंदर दिसतो.
सातारा जिल्हा त्याच्या खास “कंदी” पेढ्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. सातारा, त्याच्या ऐतिहासिक वारशासोबत, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाने समृद्ध आहे, ज्यामुळे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे.
सामाजिक माध्यमे